दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा येथील विद्यार्थ्यांचा शिक्षकांना सवाल
भास्कर राऊत मारेगाव
१० ते १५ दिवस शाळेमध्ये उपस्थित नसलेले शिक्षक शाळेत येताच विद्यार्थ्यांनी गुरुजी, आमच्यासाठी तुम्ही काय आणलं? असा भाबडा सवाल करून भांबावून सोडले. गुरुजींना काही वेळ काय बोलावं हे कळलेच नाही. नंतर त्यांच्या प्रश्नाचे स्वरूप लक्षात आल्यानंतर त्यांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत कोठे होतो ते आणि काय आणले ते सांगितले.

मारेगाव तालुक्यातील स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा प्रथम पुरस्कार पटकवणाऱ्या गोंडबुरांडा येथील दर्शन भारती विद्यालय येथे विद्यार्थी एकता मंच तर्फे गुरुजी,आमच्यासाठी काय आणलं हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुनील अष्टकार प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक संजय मोघे, विलास मेश्राम, भास्कर राऊत,दिलीप तेलंग आणि अविनाश तोडासे होते.

मारेगाव येथे नुकताच शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टप्पा 2.0 संपन्न झाला. या प्रशिक्षणामध्ये दर्शन भारती विद्यालय गोंड बुरांडा येथील इंग्रजी विषयाचे शिक्षक विलास मेश्राम हे संसाधन व्यक्ती म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण देत होते. यासाठी ते जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेऊन मारेगाव येथे टप्पा एक आणि टप्पा दोन अशा दोन्ही टप्प्यांमध्ये तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देत होते.त्यामुळे ते पंधरा दिवस शाळेत जाऊ शकले नाही.

शाळेत नेहमी येणारे आणि आपल्याला शिकविणारे शिक्षक प्रशिक्षणामध्ये व्यस्त आहेत. तसेच त्यांच्यासोबत शाळेतील इतर शिक्षकही प्रशिक्षणामध्ये जात आहेत. त्यामुळे प्रशिक्षण झाल्याबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत गुरुजी, आमच्यासाठी तुम्ही काय आणलं या कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणामध्ये आपण काय घेतलं ही भूमिका स्पष्ट केली. मेश्राम सर यांनीही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कुमारी तृप्ती खुरसाने हिने तर आभार प्रदर्शन कुमारी तनिष्का अतकर हिने केले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
