भास्कर राऊत मारेगाव
सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे घडली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव अर्जुन भाऊराव काळे वय अंदाजे 45 वर्षे असे आहे.ही घटना दि. 2 नोव्हेंबरला 4.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
अर्जुन काळे यांना तीन एकर शेती होती. तीन एकर शेतीमध्ये ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते.त्यांना दोन मुली असून एक मुलगी विवाहित आहे. तर दुसरी मुलगी शिक्षण घेत आहे. मागील दोन वर्षापासून न झालेले उत्पन्न आणि वाढत असलेला कर्जाचा बोझा यामुळे ते सतत चिंतेत राहत होते.
अशातच दिनांक 2 नोव्हेंबरला अर्जुन शेतामध्ये गेले. तिथून ते त्यांचे चुलत भाऊ अंकुश काळे यांच्या शेतात जाऊन कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना साडेचार पावणे पाच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना दिली. मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. पुढील कारवाई सुरू आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
