मार्डी येथे शिव महापुराण कथेवेळी वाहिले वचनपुष्प
भास्कर राऊत मारेगाव
व्यक्तीचे चरित्र हे त्याची संगत कोणासोबत आहे यावर अवलंबुन असते.संगत चुकली की माणुसही चुकत असतो.आणि चुका करून जो सुधारतो त्याला इन्सान म्हणतात.असे उदबोधनपर विचार आपल्या सुमधुर वाणीतून प. पु. श्री. कृष्णकुमार पांडेय महाराज यांनी मार्डी येथे दि. २२ डिसेंबरपासून सुरु असलेल्या शिव महापुराण कथा सप्ताहवेळी व्यक्त केले.
मार्डी तसेच परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी होत आहे. भक्तांच्या अलोट गर्दीने कथा परिसर फुलून गेलेला असतो.दररोज दुपारी १ ते ४ असे कथापुष्प असते.आणि दररोज सायंकाळी वेगवेगळ्या वैचारिक उदबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल असते.

यात सायंकाळी ७ वाजता हरिपाठ तर रात्री ८ ते १० कीर्तन, भारूड, अंध – मूक मुलांचा संगीतमय आर्केष्ट्रा, सुगमसंगीत अशा विविधांगी कार्यक्रमाची रेलचेल आहे.दि. २४ डिसेंबरला कथन केलेल्या विचारपुष्पामध्ये प. पु.पांडेय महाराज यांनी चंद्र – सूर्य, चौदा रुद्राक्ष,मुलाचं आणि आई-वडिलांचं नातं,बेलवृक्षाचं महत्व, भगवान शिवशंकर यांच्या जीवनातील “तीन”चे महत्व तसेच भगवान शंकरजी यांच्या शिवलिंगाचे महत्व यावर प्रकाश टाकला.
प. पु. कृष्णकुमार पांडेय यांच्या सुमधुर वाणीतून प्रस्तुत होणारी शिव महापुराण कथा भक्तांसाठी मेजवानी आहे.दि.२५ डिसेंबरला शिवपार्वती विवाह कथा होणार असून या कथा पुष्पाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. शिव महापुराण कथा समिती मार्डीतर्फे करण्यात येत आहे.
