तालुक्यातील चिंचाळा येथील घटना
भास्कर राऊत मारेगाव
जीवनाला कंटाळलेल्या शेतकरी पुत्राने शेतामध्येच विष घेऊन आपली जीवन यात्रा संपल्याची घटना दिनांक 29 जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडली. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव कुणाल सुखदेव उलमाले वय अंदाजे 18 वर्षे असे होते.
तो यावर्षी बारावी मध्ये शिकत असल्याची माहिती होती.कुणाल हा आपल्या आई-वडिलांसोबत चिंचाळा येथे राहायचा. तो एका कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. कुणाल नेहमीप्रमाणे दिनांक 29 जानेवारीला आपल्या शेतामध्ये गेलेला होता.
सायंकाळ झाली तरी तो घरी परत न आल्याने घरच्यांनी गावामध्ये त्याची सर्वत्र शोधाशोध घेतली. तो कुठेही आढळून आला नाही.शेवटी त्याच्या मोबाईलवर कॉल केले. परंतु तो कॉलही उचलत नसल्याने त्याचा भाऊ आणि शेजारी यांनी सायंकाळी शेतात जाऊन बघितले असता त्याच्या तोंडाला फेस येऊन तो त्या शेतामधील शेडच्या बाजूला पडलेल्या अवस्थेत दिसला.
कुणालच्या वडीलाकडे तीन एकर शेती असल्याची माहिती आहे. या तीन एकरामध्ये कुणाल आपला भाऊ आणि वडीलांच्या सोबत शेतीवरती काम करायचा. शेतीमध्ये दरवर्षी पडत असलेला दुष्काळ आणि होत नसलेले उत्पन्न.सोबतच उत्पन्नाला नसलेला भाव यामुळे तर कदाचित कुणालने आत्महत्या केली नसावी ना अशी शंका उपस्थित केल्या जात आहे.
वृत्त लीहीपर्यंत कुणालचा मृतदेह पंचनाम्यासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणलेला होता. कुणालच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे.
