तालुक्यातील गोंडबुरांडा येथील घटना
भैय्याजी कनाके मारेगाव,
शेतामध्ये बैल चरायला गेलेल्या शेतकरीपुत्राचा अखेर मृतदेहच विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना तालुक्यातील गोंड बुरांडा येथे घडली असून आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव अमोल भदुजी पारखी वय ४२ असे आहे.
अमोल यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे. अमोल हा नेहमीप्रमाणे दिनांक २६ डिसेंबर २०२४ रोज गुरुवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास ठेक्याने केलेल्या शेतात बैल चरायला घेवुन गेला होता.सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान बैल हे घरी परत आले.परंतु अमोल हा बैलांसोबत घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी त्यानी ठेक्याने केलेल्या शेताकडे जावुन पाहीले असता तो कुठेही दिसुन आला नाही.
त्यांनी परिसरात सगळीकडे शोधाशोध केला. परंतु त्याचा कोठेही मागमूस लागला नाही.अखेर त्यांनी बाजुचे शेतातील विहीरीकडे जावुन पाहीले असता अमोलच्या चपला विहीरीतील पाण्यावर तरंगतांना दिसल्या. त्यामुळे नातेवाईकांनी गावातील लोकांच्या मदतीने लोखंडी गर च्या साह्याने विहीरीच्या पाण्यात शोध घेतला असता अमोल भदुजी पारखी हा मृत अवस्थेत आढळला.
दिनांक २६डिसेंबर २०२४ रोज गुरुवारला रात्री ८वाजताच्या दरम्यान सदर घटना उघडकीस आली. त्यांच्या नातेवाईकांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.
मृतक अमोल यांचे पश्चात आई,वडील,पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिपर्यंत मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जमादार दिगांबर कीनाके करीत आहे.
