भास्कर राऊत मारेगाव
वणी विधानसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले आहे. उमेदवार सुद्धा ठरले. आता फक्त उत्सुकता लागली आहे ती लढत तिरंगी होणार की चौरंगी याकडे. कारण तीन मोठ्या पक्षांचे उमेदवार ठरल्यानंतर नाराज झालेले काय करणार याकडे वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
वणी विधानसभा क्षेत्राकडे अख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याची विधानसभा क्षेत्रातील जनतेला उत्सुकता होती. महायुतीमध्ये हा मतदार संघ भाजपला होताच आणि भाजपने आपल्या विद्यमान आमदारावर विश्वास दाखवत संजीवरेड्डी बोदकुरवार यांचीच उमेदवारी निश्चित करून प्रचारात आघाडी घेतली.
महाविकास आघाडीचे घोडे हे काँग्रेस की उबाठा इथेच अडलेले होते.अखेर वणी मतदार संघ हा शिवसेना उबाठा या पक्षाला सुटला आणि संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून परंपरागत उमेदवार राजू उंबरकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
वणी विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले गेले. जवळपास 17 दावेदारांनी पक्षाकडे उमेदवारी मागून पक्षामध्ये मोठे दावेदार आहे हेही दाखवून दिले होते. परंतु हा मतदारसंघ शिवसेना उभाठा गटाला गेला. आता काँग्रेस पक्षातील दावेदार काय करतात याकडे वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
संजय खाडे यांनी मागील दोन वर्षापासून या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये स्वतःची तयारी सुरू केलेली होती. अनेक गावांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम, विकास कामे राबवत, वेगवेगळ्या योजनांची माहिती गावोगावी पोहोचवत त्यांनी आपण दावेदार होतो हे सिद्ध केले होते. आता त्यांच्या भूमिकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.वणी विधानसभा क्षेत्राची निवडणूक ही तिरंगी होणार की चौरंगी?हे येणारा काळच ठरवेल.
