मुंबई येथील आझाद मैदानावर होणार आमरण उपोषण
भास्कर राऊत मारेगाव
समग्र शिक्षा अभियानांतर्गत काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिनांक ४ मार्चपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तसेच या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास दिनांक 4 मार्चपासूनच मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे.
सर्व शिक्षा अभियान तसेच समग्र शिक्षा योजना अंतर्गत सन २००२ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात, सर्व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर व महानगरपालिका स्तरावर सहाय्यक कार्यक्रमाधिकारी, विषय साधन व्यक्ती, कनिष्ठ अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस ऑर्डिनेटर, दस्तऐवज व संशोधक सहाय्यक व वरिष्ठ लेखा सहायक अशा विविध पदावर कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी कार्यरत आहे. सदर कर्मचारी उच्च पदवीधारक बी.ई.सिव्हील, बी.एड. एम.एससी.बी.एड. एम. फील.अशा उच्च शैक्षणिक पात्रता धारक आहेत. सदरील सर्व कंत्राटी कर्मचारी यांची नेमणूक सक्षम अधिकारी यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन बिंदू नामावली, लेखी परीक्षा, मुलाखत अशी तत्कालीन निवड कार्यपद्धती अवलंबून नेमणूक दिलेली आहे.
सदर कंत्राटी कर्मचारी 18 ते 20 वर्षापासून शिक्षकांना अध्यापन करणे, शालेय शिक्षण विषयक प्रशिक्षण देणे, शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करणे, शाळा भेट करून आदर्श पाठ घेणे, विद्यार्थी मार्गदर्शन तसेच शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विषयक योजना राबविणे, जिल्हा परिषद व मनपा क्षेत्रातील माहितीचे संकलन व संश्लेषण करणे,शाळा खोली बांधकाम व भौतिक सुविधा इत्यादी कामे केली जातात. शाळा माहिती सांख्यिकी एस सी ई आर टी, एन सी ई आर टी स्तरावरील साहित्य वितरण अशी कामे अत्यंत तुटपुंज्या मानधनावर गेली 18 ते 20 वर्षापासून करीत आहेत. तसेच त्यांचे नवीन नोकरी मिळण्याची वयोमर्यादा ही संपलेली आहे.
18 ते 20 वर्षापासून आमरण उपोषण आंदोलन व मोर्चाद्वारे वारंवार प्रश्न शासन दरबारी मांडले गेले. परंतु शासन स्तरावर अद्याप यांना कोणतेही प्रकारचे यांच्या बाबतीत निर्णय घेतल्या गेल्या नाहीत. तसेच 18 ते 20 वर्षापासून मानधनाव्यतिरिक्त शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक लाभाच्या योजना, कोणताही लाभ कायम कर्मचाऱ्याप्रमाणे अद्याप पर्यंत मिळालेला नाही. समग्र शिक्षा योजनेतील काही कर्मचाऱ्यांना 08 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाद्वारे सेवेत कायम केलेले आहे. तर काही कर्मचारी अजूनही सेवेत नियमित होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
या मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 4 मार्चपासून सर्व कर्मचारी हे काम बंद आंदोलन करणार आहे तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर चार मार्चपासूनच आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या सर्व कर्मचाऱ्यांनी संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे.
नाहीतर स्वेच्छा मरणाची परवानगी द्या
समग्र शिक्षा विभागातील कंत्राटी कर्मचारी मागील अनेक वर्षापासून त्यांना नेमून दिलेली कामे करीत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या अहर्तानुसार,त्यांच्या व्यवसायिक पात्रतेनुसार शिक्षण विभाग किंवा इतर कोणत्याही विभागात रिक्त पदावर त्यांचे समायोजन करण्यात यावे. किंवा त्याच पदावर सेवेत नियमित करण्यात यावे. ही समायोजनाची अट मान्य होत नसेल तर कंत्राटी सेवापूर्तीच्या 58 व्या वर्षानंतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केलेली आहे.
